औरंगाबाद : गुंठेवारी नियमातीकरणासाठी नागरिकांना धमकावले जात असून स्वतः पालकमंत्री नागरिकांना धमक्या देत आहेत. पालकमंत्री हे वसुलीदार तर मालमत्तावर बुलडोझर चालवण्याची भाषा करणारे मनपा प्रशासक हे शिवसेनेचे व्यवस्थापक असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे शहराध्यक्ष केणेकरांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यावर आता शिवसेना देखील आक्रमक झाली असून विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी भाजपला वसुलीचे पुरावे द्या अन्यथा माफी मागा असा इशारा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गोरगरीबांची अनाधिकृत घरे अधिकृत व्हावीत यासाठी गुंठेवारी कायदा मंजूर करून डिसेंबर २०२० पर्यंतची घरे नियमीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. शिवसेनेने घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला पोटसूळ उठले आहे. त्यामुळेच शिवसेनेवर वसुलीचे आरोप करण्यात आले असा आरोपही वैद्य यांनी केला.
राजू वैद्य म्हणाले कि, वसेनेवर वसुलीचे आरोप करण्यात आले. भाजपच्या कोणत्याही पदाधिकार्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी वसुलीचे पुरावे द्यावेत, नसता शिवसेनेची जाहीर माफी मागावी. शहरातील सर्वसामान्य नागरिक ज्यांचे हातावर पोट आहे. असे लोक गुंठेवारी भागात राहतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही सोयी-सुविधा देता येत नव्हत्या. शिवसेनेने पुढाकार घेऊन महापालिकेच्यामार्फत या भागांमध्ये सुविधा दिल्या. सुरूवातीला या भागांत विद्युत व्यवस्था नव्हती तत्कालीन पालकमंञी चंद्रकांत खैरे यांनी पुढाकार घेऊन या भागांमध्ये वीजपुरवठा करण्याची व्यवस्था करून दिली. त्याच बरोबर मी सभापती असताना या भागातील पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण केली हे जनतेला माहिती आहे असे राजू वैद्य म्हणाले. गुंठेवारीतील अनाधिकृत घरे नियमीत करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय शिवसेनेने घेतला. या निर्णयामुळे लाखो गरिबांची घरे नियमीत होऊन त्यांना मालकीहक्क मिळणार आहे. गुंठेवारीतील घरे नियमीत होत असल्याने नागरिकांना आनंद असून त्यांनी शिवसेनेचे आभार मानत आहेत. यामुळेच भाजपचे पोटसूळ उठले आहे. भाजप शहर अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत शिवसेना गुंठेवारीतील वसुली करत असल्याचा आरोप केला. या आरोपाचा तीव्र निषेध करतो. शिवसेनेने केलेल्या प्रयत्नामुळेच गोरगरीबांची अनाधिकृत घरे नियमीत होत आहे. याकरिता मी स्वतः वेळावेळी पाठपुरावा केला. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा विषय मांडला व सरकारने तातडीने निर्णय घेतला. या निर्णयामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. त्यामुळेच शिवसेनेवर वसुलीचे आरोप केले जात आहेत. भाजपच्या पदाधिकार्यांनी वसुलीचे पुरावे देऊन आरोप सिध्द करावेत, अन्यथा शिवसेनेची जाहीर माफी मागावी. यासोबतच भाजपाला उघडे पाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही राजू वैद्य यांनी दिला.
काय म्हणाले होते भाजपचे शहराध्यक्ष ?
शासनाच्या आदेशान्वये गुंठेवारी नियमितीकरना अंतर्गत संबंधीत वसाहतीतील मालमत्ता नियमित केल्या जात आहेत. नागरिकांनी गुंठेवारी भागातील आपल्या मालमत्ता नियमित करून घ्या, अन्यथा सदर इमारती जमीनदोस्त केल्या जाईल. अशी धमकी ,भिती, दहशत, मनपा प्रशासक व पालकमंत्री लोकांमध्ये निर्माण करत आहेत. पालकमंत्री हे वसूलीदार तर प्रशासक हे शिवसेनेचे व्यवस्थापक असल्याचा घणाघाती आरोप मंगळवारी भाजप शहर अध्यक्ष संजय केनेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. या दोघांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली जाणार असल्याचेही ते म्हणाले होते.
नवीन गुंठेवारी योजना अंतर्गत नागरिकांनी 31 ऑक्टोबर पर्यंत शहरातील गुंठेवारी भागातील व्यासायिक व निवासी मालमत्ताचे नियमितीकरण करून घ्यावे. अन्यथा 1 नोव्हेंबर पासून या सर्व मालमत्तावर बुलडोझर चालवून सदर मालमत्ता जमीनदोस्त केल्या जाईल. असा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. यावर नंतर केवळ व्यासायिक मालमत्तावर कारवाई होईल. असे सांगितले होते. यावर सोमवारी (दि. २५) पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तूर्तास स्थगिती देत ही कारवाई दिवाळी नंतर करावी असे निर्देश दिले आहे. यानंतर भाजपाने पत्रकार परिषद घेतली. प्रसंगी केनेकर यांनी मनपा आयुक्त व पालकमंत्री याचा वर नागरिकांना घाबरून धमकवणे व लोकांत दहशत निमार्ण करण्याचे आरोप केले आहेत. या दोघांच्या विरोधात भाजपच्या वतीने बुधवारी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच दिवाळीनंतर भव्य मोर्चा मनपा कार्यल्यावर काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राजेश मेहता, बापू घडामोडे, राजगौरव वानखेडे, नितीन चित्ते, शिवाजी दांडगे, मनीषा मुंडेसह भाजपा कार्यकारणी सदस्यांची उपस्थिती होती.