औरंगाबाद : येथील प्रसिद्ध व्यापारी तथा थोर समाजसेवक, निस्वार्थ कर्मयोगी, अजातशत्रू, माहेश्वरी समाजभूषण जयनारायणजी देविचंद बाहेती यांचे आज शुक्रवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. माचिसवाले बाहेती म्हणून ते सर्वत्र परिचित होते. जयनारायणजी बाहेती यांच्या निधनामुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी पाच वाजता एन-६, सेंट्रल नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अतिशय मनमिळाऊ, धार्मिक आणि समाजाप्रती तळमळ असलेले सकारात्मक विचारांचे धनी जयनारायणजी यांनी वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेत व्यापार व उद्योग क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला. ते १९७० पासून व्यवसाय क्षेत्रात होते. माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष असताना त्यांनी सामाजिक जाणिवेतून १९९४ साली ३३ जोडप्यांचा संसारोपयोगी साहित्य देऊन सामूहिक विवाह सोहळा थाटात संपन्न केला होता. त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय राहून अनेक प्रकल्प राबवून वेगळा आदर्श निर्माण केला. जयनारायणजी नेहमी म्हणायचे, नवीन पिढीने संघटात्मक कार्यात अग्रेसर राहावे. आपला अमूल्य वेळ व्यर्थ न घालता सतत कार्यमग्न राहावे. त्यातूनच प्रगतीचा मार्ग सुकर होतो असा ते संदेश द्यायचे. जयनारायणजी बाहेती यांचा मोठा परिवारआहे. गतवर्षी कोरोना काळात १३ सप्टेंबर रोजी त्यांचे बंधू प्रसिद्ध अॅड. रामकिशन बाहेती यांचे दुःखद निधन झाले होते. त्यानंतर बाहेती परिवाराला जयनारायणजी यांच्या निधनाने दुसरा मोठा धक्का बसला असून बाहेती परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जयनारायणजी यांच्या पश्चात पत्नी सुशिलाबाई, दोन मुले प्रसिद्ध बिल्डर अशोक बाहेती आणि व्यापारी अश्विन बाहेती, मुलगी अंजली करवा, भाऊ राधाकिशन बाहेती, विजय बाहेती, बाबूशेठ बाहेती, बहीण पुष्पाबाई सिकची, चंदाबाई गिल्डा, संगीता सारडा, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. दैनिक मराठवाडा साथी, राजस्थानी मल्टीस्टेट आणि बंसल क्लासेस परिवार बाहेती कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.