मराठवाडा साथी न्यूज
भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आग प्रकरणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज(२५ जाने.)एका मोर्चाचे भंडाऱ्यात नेतृत्त्व करत आहेत.या रुग्णालयात १० निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.याच मागणीसाठी भाजपकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भंडारा रुग्णालयातील आग दुर्घटनेपला अनेक दिवस उलटल्यानंतरही याबाबत कोणत्याही प्रकाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.त्यामुळे मृत बालकांच्या पालक आणि नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने लवकरात लवकर चौकशीचे आदेश दिले होते. ज्यानंतर एक अहवालही सादर करण्यात आला होता.या ५० पानी अहवालामध्ये मध्ये दोन परिचारकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचे नमूद करण्यात आले होते.
दरम्यान,या घटनेसंदर्भातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच एक आश्वासन दिले होते.दुर्घटनेच्या अहवालाचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल. ज्यानंतर अहवालाच्या निष्कर्षाच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्यांना शिक्षा होईलच यात शंका नाही,असे ते म्हणाले होते.