कन्नड तालुक्यातील विविध गावातील रुग्णांचा समावेश
कन्नड । प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाच्या निमित्त उपवास केलेल्या महिलांनी व नागरिकांनी उपवास सोडण्यासाठी भगर खाल्ली त्यातून मळमळ, उलट्या, चक्कर येणे सुरू झाल्याने मंगळवार (दि.२७) सप्टेंबर रोजी १२ महिलांना चक्कर येऊन मळमळ उलट्या सुरू झाल्या त्यात दहा महिला आहेत. त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.त्यापैकी आठ जणांची प्रकृती अचानक खालावल्याने पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे अशी माहिती रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.शरदसिंग परदेशी यांनी दिली.
नवरात्रोत्सवाच्या निमित्त उपवासासाठी केलेल्या भगरीचा भात खाल्ल्याने कविता बळीराम राठोड वय ४५, निकिता बळीराम राठोड, वय १८ दोन्ही राहणार मुंडवाडी तांडा, अनिता तानाजी अहिरे वय ४५ राहणार नांदगिरवाडी, शालुबाई बाबुराव घुले वय ३५ राहणार चिंचखेडा, पूर्णा अशोक जाधव वय ३५ राहणार बोलटेक तांडा, छल्लीबई नारायण जाधव वय ४५ राहणार बोलटेक तांडा, मालताबाई जगन्नाथ बोर्डे वय ३५ राहणार बनशेंद्रा, सुनिता साईनाथ बोर्डे वय ३५ राहणार जैतापुर, कांताबाई भागिनाथ जेठे वय ३५ राहणार जैतापुर, निर्मला संजय काळे वय ३६ राहणार बिबखेडा, सोनाली ज्ञानेश्वर थोरात वय ४० वर्ष राहणार कारखाना या महिलांना भगर खाल्ल्यानंतर चक्कर येऊन उलट्या, मळमळ होणे आदी त्रास सुरू झाला. या महिलांना कन्नड ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी कविता राठोड, निकिता राठोड, बाळासाहेब अहिरे, शालुबाई घुले, पूर्णा जाधव, चलीबाई जाधव, भागुबाई बोर्डे या आठ जणांवर कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सुनिता साईनाथ कोरडे कांताबाई भागिनाथ जेठे, निर्मला संजय काळे यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सदरील रुग्णांना कन्नड ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले व उपचार सुरू करण्यात आले. या ठिकाणी रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.शरदसिंग परदेशी, डॉ. प्रवीण पवार, डॉ.रुपेश माटे, परिचारिका स्वाती डोळस हे उपचार करत आहेत.
ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका शोभेची वस्तू
रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाची प्रकृती अचानक खालावली असेल, किंवा एखादा अपघातातील रुग्ण असेल अशा रुग्णांना औरंगाबाद येथे उपचारासाठी नेण्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दोन रुग्णवाहिका आहेत. परंतु मंगळवारी कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची तब्येत अचानक खालवल्याने त्यांना औरंगाबाद येथे रेफर करण्याचे आदेश वैद्यकीय अधिका-यांनी दिले. एक रुग्णवाहीकेत काही रुग्ण गेले मात्र उर्वरित काही रुग्णांना रुग्णालयात रुग्णवाहिका उभी असताना देखील खाजगी वाहनाने औरंगाबाद येथे उपचारासाठी जावे लागले. ह्या रुग्णवाहीका फक्त रुग्णालयाच्या शोभेसाठी आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता
मंगळवारी सकाळपासुन शहरातील अनेक खाजगी रुग्णालयात तालुकाभरातुन मोठ्या संख्येने भगरीच्या विषबाधेचे रुग्ण उपचार घेता आहेत. काही उपचार घेऊन घरी गेले आहेत. त्यामुळे तो १५० रुग्णांच्या वरती जाण्याची शक्यता आहे. भगरीतुन विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती अगदी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
उपवासाचे पदार्थ चांगले दर्जाचे घ्यावेत.
नागरीकांना उत्तम प्रतीचे सुरक्षित व आरोग्यदायी अन्न पदार्थ उपलब्ध करुन देणे हे अन्न व औषध प्रशासनाचे अत्यंत महत्वाचे काम आहे. त्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने ज्या गावात रुग्ण आहे त्या रुग्णाला भगर कोठुन विचारुन त्या दुकानवर धाडी माराव्यात. १४ रुग्ण हे सगळे भगरीचे आहेत. त्यामुळे ती भगर एकाच कंपनीची असेल ती कन्नड मधूनच सप्लाय झाली असेल त्या कंपनीवर लगेच बंदी आणावी. तसे मी तहसील कार्यालयाला देखील कळवणार आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाने देखील ताबडतोब या दुकानावर धाडी टाकून ती भगर जप्त करावी. आणि त्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवावे.– डॉ.शरदसिंग राजपूत, (अधिक्षक ग्रामीण रुग्णालय,कन्नड )
भगरीचे पीठ घरीच तयार करा
खुल्या बाजारातून किंवा हातगाडीवरून भगरीचे सुटे पीठ खरेदी करू नये तर बाजारातून खरेदी केलेल्या पॅकबंद भगरीचेच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे. सकाळी तयार केलेली भगर शिळी झाल्यावर रात्री खाऊ नये असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.