Home अहमदनगर मूल्य शिक्षण व ‘स्टार्ट अप इंडिया’ या विषयांवर कार्यशाळेचे आयोजन

मूल्य शिक्षण व ‘स्टार्ट अप इंडिया’ या विषयांवर कार्यशाळेचे आयोजन

3784
0

कोपरगाव : भारतासारख्या देशाला नीतिमूल्ये व जीवनमूल्ये जोपासण्यासाठी प्राचीन परंपरा आहे, मात्र अलीकडे या मूल्यांचा ऱ्हास होतांना दिसतो. त्याचमुळे आज चांगला माणूस घडविण्यासाठी मूल्य शिक्षण हा विषय काळाची निकडीची गरज आहे. असे प्रतिपादन जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी कोपरगाव येथे केले. येथील के.जे. सोमैया महाविद्यालयातील मराठी व हिंदी विभागाचे संयुक्त विद्यमाने व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या सहकार्याने ‘मूल्य-शिक्षण’ व ‘स्टार्ट अप इंडिया’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. छत्रपती उद्योग समूह, औरंगाबादचे संस्थापक अध्यक्ष संतोष भंडारी हे होते.
पाटील पुढे म्हणाले की, नव्या पिढीला मूल्यशिक्षण नको, असे कोणीच म्हणणार नाही. त्यांनाच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांनी मूल्य शिक्षण घेण्याची गरज आहे. मोठ्यांनी मूल्य शिक्षण घेतले व आचरणात आणले तर आपोआपच नव्या पिढीवर अशा प्रकारचे संस्कार होतील. जीवनात आपण कितीही आर्थिक दृष्ट्या समृद्ध झालो, तरी आपल्याकडे जीवनमूल्य, निती – मूल्ये नसतील तर आपण माणूस म्हणून समृद्ध होऊ शकत नाही. त्यासाठी ही मूल्ये आपण जाणीवपूर्वक जोपासली पाहिजे. आज मूल्यांच्या अभावामुळे अनेक जण एकाकी, एकांकी, हतबल, निरुत्साही, हिंसाचारी बनत आहेत. त्यामुळे व्यापक मानवतेचा संदेश देणारे, प्रत्येकाला चांगुलपण जपणारे मूल्य-शिक्षण द्यायला हवे. त्यासाठी केवळ शाळा महाविद्यालयांवर ही जबाबदारी टाकून सर्व समाज मोकळा होतो, हे व्यापक देश व समाजहिताच्या दृष्टीने योग्य नाही.
अध्यक्षीय समारोप करताना औरंगाबाद येथील श्री छत्रपती उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ‘स्टार्ट ऑफ इंडिया’ या विषयावर बोलताना म्हणाले की, बीड सारख्या परिसरातून येऊन मल्टीस्टेट बँक स्थापन केली व मागील ३ वर्षात या बँकेच्या महाराष्ट्र व कर्नाटकात २१ शाखा असून अल्पावधीतच त्यांच्या १०० शाखा होतील . या शिवाय बिल्डिंग क्षेत्रातही माझे प्रोजेक्ट सुरू आहेत. कोणताही व्यवसाय सुरू करतांना तुम्ही समोरच्या व्यक्तीला न कंटाळता समजून घेणे, सकारात्मकदृष्टी ठेवणे महत्त्वाचे असते. आपल्याला एखाद्या नवीन उद्योग सुरू केलेल्या व्यक्तीचे घर-बंगला-गाड्या दिसतात, मात्र त्यासाठी त्या व्यक्तीने केलेल्या त्याग व कष्ट दिसत नाही. तुम्ही ठरवले तर तुम्हीही मोठे उद्योजक बनू शकतात.
त्याप्रसंगी जगन्नाथ पाटील यांनी नटसम्राट ‘टू. बी. और टू. बी.’ संपूर्ण संवाद एकापात्री पद्धतीने साकार केला, तसेच महाराष्ट्रात या अलीकडे अनेक स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराचे कवितेद्वारे प्रकट करून श्रोत्यांना मंत्र मुग्ध व अंतर्मुख केले.
कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. गणेश देशमुख, डॉ. संजय दवंगे , डॉ. वसुदेव साळुंके यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे यांनी व आभार प्रदर्शन डॉ. वसुदेव साळुंके यांनी केले. या कार्यक्रमातच प्रश्नाचे योग्य उत्तर दिल्याने श्री. पाटील व श्री. भंडारी यांनी वैभव विठ्ठल हेंगडे या प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गातील विद्याथर्याला रु. ११००/- चे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. एकपात्री सादरीकरण काव्य, शैली, संवाद या पद्धतीने झालेल्या या कार्यशाळेस बहुसंख्येने विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here