मुंबई :गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’. या मंचावरून होणाऱ्या विनोदाच्या आतिषबाजीने प्रेक्षकांना भरभरून हसवले.या मंचावर एकशे एक विनोदवीर आहेत. पण गेले काही दिवस या मंचावर एक कलाकार दिसत नाहीय. तो म्हणजे अभिनेता सागर कारंडे. सध्या सागर चला हवा येऊ द्या मध्ये दिसत नसल्याने त्याने हा कार्यक्रम सोडला अशी चर्चा आहे.कारण सागर करत असलेलं पोस्टमन हे पात्र आता अभिनेत्री श्रेया बुगडे साकारत आहे. याच पात्रावरून आता सोशल मिडियावर नाराजीचा सूर उमटत आहे.सागर कारंडे म्हणजे पोस्टमन काका ही जणू ओळखच झाली आहे. सागर ने वाचलेल्या पत्राने कधी आपल्या हसवलं, कधी रडवलं तर कधी विचार करायला भाग पाडलं. पण आता सागर कारंडे नसल्याने बऱ्याच दिवसात पोस्टमन काका हे पात्र कुणी साकारलं नाही. नुकत्याच झालेल्या भागात अभिनेत्री श्रेया बुगडे पोस्टमन म्हणून आली.याने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याभागाचा व्हिडीओ शेअर केला. यामध्ये श्रेयाने पोस्टमन बनून पत्रवाचन केले आहे. पण श्रेयाने या पत्राचं वाचन करणं नेटकऱ्यांना मात्र पटलं नाही.श्रेयाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक नाराजीच्या कमेंट केल्या आहेत.प्रेक्षकांनी श्रेयाची तुलना थेट सागरशी केली आहे.’सागरच्या आवाजामध्ये जी जादू आहे ती श्रेयाच्या आवाजामध्ये नाही, सागर दादा तुमची आठवण येते.’ अशी कमेंट यावर आली आहे.तर एकाने म्हंटलं आहे की, ‘सागर कारंडे यांचंच वाचन उत्तम होतं, सागर कारंडे बेस्ट’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.पण सागर ने खरच मालिका सोडली का? की तो चित्रीकरणात व्यस्त आहे यावर मात्र वाहिनी आणि सागर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.