कोपरगाव (किसन पवार):
सप्टेंबर महिन्यात दोन वेळा अतिवृष्टी आणि सर्वदूर संततधार पावसामुळे बहुतेक सर्व पिके आत्ताही पाण्याखाली आहेत.
तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांनी पंचनामे सुरू केले आहेत.आपल्या शेतातील नुकसान झालेले फोटो काढून ठेवा. आपले बँक अकाउंट तसेच IFSC नंबर त्यांना तत्काळ द्या. असे कळकळीचे आवाहन कोपरगाव चे तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की ,तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायक यांना नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्या करिता व बँक अकाउंट डिटेल्स गोळा करण्या करिता सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केल्यास लवकरात लवकर आपण शासनाला नुकसानीची अंतिम आकडेवारी देऊ शकू.
गावातील दक्षता समिती, तंटामुक्ती समिती चे सर्व सदस्य यांनी या कामी तलाठी, ग्रामसेवक यांचेकडे नुकसान ग्रस्त शेतकरी यांची यादी बँक अकाउंट डिटेल्स सह दिल्यास पंचनामे लवकर होतील. कारण आज शेतकरी अतिशय हतबल झालेला असून आपण सर्वांनी मिळून सहकार्य केल्यास शासनाकडे अनुदान मागणी लवकर करता येईल. त्याचप्रमाणे ज्यांचे नुकसान झाले नसेल अशा व्यक्तींचा यादी मध्ये समावेश चुकून ही करू नका असे खास करून नमूद केले आहे
आपल्या गावातील शेतकऱ्यांची जी माहिती संकलित केली जाणार आहे ती प्रशासन जतन करून ठेवणार असल्यामुळे पुढील काळात अशी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास तत्काळ मदत पुरवता येईल. तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक यांनी कार्यकर्ते यांचे कडून याद्या घ्याव्यात आणि गावातील शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित करून जतन करून ठेवावी आणि ज्यांचे नुकसान झाले आहे अशा व्यक्तींची यादी संयुक्त पंचनामा सह जमेल तितक्या लवकर सादर करावी.
शेतकऱ्यासाठी पुढील एक आठवडा देऊन पंचनामे व माहिती शासनाकडे लवकरात लवकर पाठवण्यासाठी सहकार्य करावे.