शेवगाव / लक्ष्मण मडके
पालकांनी आपल्या पाल्याचे मित्र होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी पालक मेळाव्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व पालकांसमोर केले. आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव या ठिकाणी आज पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य संजय चेमटे, उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर, पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे ,ज्येष्ठ शिक्षक सखाराम घावटे, पालक प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब कोळगे, शरद सोनवणे, बाबासाहेब देवढे, राजेंद्र उगलमुगले, रईस सय्यद, सविता कोळगे, भगवान घुगे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य चेमटे आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी पालक व शिक्षक या तिघांचेही योगदान अत्यंत महत्त्वाचे असते त्यामुळे पालकांनी व शिक्षकांनी एकत्रीत मुलांच्या भवितव्याला योग्य ती दिशा देण्याचे काम करावे .पालकांनी आपल्या पाल्याचे मित्र, त्याची वेशभूषा, केशभूषा याकडे बारकाईने लक्ष द्यावे, आपल्या पाल्यांना मोबाईलच्या व टीव्हीच्या जास्त आहारी जाऊ देऊ नये तसेच मुलाचा जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी सत्कारणी लावावा असे सांगितले. तुमची पाल्य ही तुमची म्हातारपणाची काठी आहे तर आम्हा शिक्षकांचे दैवत आहे म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम आपण करुया असे अवाहन केले. उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आम्ही सर्व प्रशासक व प्राध्यापक कटिबद्ध आहोत . विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास घडून यावा यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रम , प्रबोधन वर्ग राबवले जातात .विद्यार्थ्यांच्या जीवनातील इ . अकरावी व इ . बारावीचा काळ हा जीवनाला दिशा देणारा काळ असतो त्यामुळे त्यांचे हित लक्षात घेऊन कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक कामकाज करतात असेही त्या म्हणाल्या .सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु . दक्षता देवढे व कु . कोमल वखरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा . अशोक तमनर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालक प्रतिनिधी म्हणून शरद सोनवणे ,बाबासाहेब कोळगे, कचरू गायकवाड, श्रीमती इनामदार यांनी आपले विचार व्यक्त करत कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. रामदास गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा .सविता फाटके यांनी केले .