लखनऊ: उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात होता, ती मुलगी नोएडा येथे जिवंत सापडली आहे. ही मुलगी एका माणसासोबत कारखान्यात काम करत होती. त्यामुळे आता ज्या मुलीचा मृतदेह विहिरीतून सापडला होता ती कोण होती, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी एका जोडप्याला घटनास्थळी बोलावले होते. या दाम्पत्याने पोलीस ठाण्यात आपली मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. हा मृतदेह त्यांच्याच मुलीचा असल्याचं दोघांनी सांगितलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, दहा महिन्यांपूर्वी गोपीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील सचिपूर पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आपली १६ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं आणि गावातीलच लोकांनी तिचे अपहरण केले असण्याची शक्यता व्यक्त केली होती. दरम्यान, उंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला होता.त्यानंतर बेपत्ता मुलीच्या पालकांनी मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याची ओळख पटवली. याप्रकरणी दोन मुलांविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गावातील दोन मुलांना अटक करून अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात त्यांची कारागृहात रवानगी केली होती.
यादरम्यान पोलिसांनी त्यांचा तपास सुरू ठेवला आणि ती मृत मुलगी नोएडा येथील एका कारखान्यात पोलिसांना सापडली. मुलगी सापडल्यानंतर तिच्या पालकांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, त्यांची मुलगी नोएडामध्ये असल्याची माहिती नातेवाईकांन होती. नातेवाइकांनी जाणीवपूर्वक पुरावे लपवून दोन्ही मुलांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे.या तरुणीचे लग्न झाले आहे. तिची आई मुलीवर अत्याचार करत असे, त्यानंतर ती स्वतःच्या इच्छेने नोएडाला गेली, असा आरोप आहे. पण, तिच्या पालकांनी तिला सांगितलं होतं की जर तू कधी पकडली गेली तर या दोन मुलांवर अपहरणाचा आरोप कर, असं पोलिसांनी सांगितलं.
ही मुलगी बऱ्याच दिवसांपासून तिच्या पालकांच्या संपर्कात होती. मुलीने सांगितले की, ती नोएडा येथे राहात असल्याचे तिच्या घरच्यांना माहीत होते. पुरावे लपवून मुलीच्या कुटुंबीयांनी खोट्या माहितीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यांच्याविरुद्ध कलम १८२/२११/२०१/१९४/३४४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. सध्या पोलीस आता याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.