खासगी रुग्णालयांच्या दरांवर नियंत्रण ठेवावे – डॉ. अभिजीत पाखरे
औरंगाबाद : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संर्सगाच्या पार्श्वभूमीवर पर्याप्त प्रमाणात उपचार सुविधांचे नियोजन करताना गृहविलगीकरणातील रुग्णांची योग्य देखरेख आवश्यक असल्याने त्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना डॉ. अभिजीत पाखरे ,केंद्रीय पथक प्रमुख तथा सहप्राध्यापक, जनऔषध विभाग, मध्यप्रदेश यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या आढावा बैठकीत डॉ. अभिजीत पाखरे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले,आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे,निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर,उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.विजय वाघ,मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी,घाटीच्या डॉ.वर्षा रोटे, यांच्यासह सर्व संबंधित प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. अभिजीत पाखरे यांनी प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी कोवीडच्या नियमावलीचे पालन प्रत्येकाने योग्य पध्दतीने केले तर निश्चितच संसर्ग वाढ थांबविता येईल,त्यादृष्टीने जनजागृती करुन लोकांकडून नियमांचे पालन प्रभावीरित्या करुन घेण्यात यावे.तसेच कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करणे गरजेचे असून गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराबाबत योग्य पद्धतीने देखरेख होणे आवश्यक असल्याचे डॉ. अभिजीत पाखरे यांनी सूचीत केले. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच उपचार होणे बंधनकारक असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असून ते अधिक प्रभावीपणे करण्याचे सूचित केले. लसीकरण मोहीमेची माहिती घेऊन अधिक व्यापक प्रमाणात चाचण्या आणि लसीकरण मोहीमेची अमंलबजावणी करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रभावीपणे राबवल्या जात असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना चाचण्यांचे प्रमाण,संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या, शोध, खासगी ,शासकीय आरोग्य सुविधांमध्ये वाढ, कन्टेनमेंट झोन व्यवस्था यासह इतर उपाययोजना बाबतची सविस्तर माहिती यावेळी दिली. प्रशासनामार्फत कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हयात शहरी भागात 26 तर ग्रामीण मध्ये 78 कन्टेनमेंट झोन करण्यात आले आहेत. तसेच कोरोना उपचार सुविधात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत असून 182 उपचार सुविधा सध्या उपलब्ध असून 20 हजार खाटांची व्यवस्था सह वाढीव उपचार सुविधांमध्ये पूरक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे सांगून श्री. चव्हाण यांनी कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून 104 केंद्रावर चाचण्यांची सुविधा आहे. तसेच लसीकरण केंद्रातही वाढ करण्यात आली असून 133 केंद्रावर लसीकरण केल्या जात असल्याचे सांगून पर्याप्त प्रमाणात जिल्ह्यात ऑक्सीजनसाठा, रेमडीसीवीर औषध उपलब्ध असून त्याचप्रमाणे कोवीड नियमावलीचे प्रभावी पालन करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याच बरोबर शनिवार,रविवार या दोन दिवशी कडक लॉकडाऊनचे यशस्वी पालन केल्या जात असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले.
डॉ. गोंदावले म्हणाले ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उपचार सुविधा, कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात येत असून ग्रामीण मध्येही खासगी सीसीसी, गृह विलगीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मोठ्या संख्येने खाटांची संख्या वाढवण्यात येत असून त्याला पर्याप्त अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. तसेच नियोजन आणि समन्वयपूर्वक स्थानिक यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवल्या जात असल्याचे सांगून डॉ. गोंदावले यांनी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील संर्सग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती यावेळी दिली.
औरंगाबाद जिल्ह्याने अनेक बाबी यामध्ये “ माझे आरोग्य माझ्या हाती” या ॲपची सुरवात तसेच दुकानदार, विक्रेते यांच्या चाचण्याची सुरवात, सगळ्या जास्त संख्येने चाचण्या, शनिवार, रविवार लॉकडाऊन यासह अनेक नाविन्य पूर्ण उपाययोजना राबवून वाढता संर्सग वेळीच रोखण्यासाठी राबवलेल्या उपायांची माहिती डॉ. स्वप्नील लाळे यांनी यावेळी दिली. तसेच सर्व संबंधितांनी यावेळी आपल्या यंत्रणेद्वारा करण्यात येत असलेल्या उपचार सुविधांबाबत यावेळी माहिती दिली.