छत्रपती संभाजीनगर:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेवून फिरते पथक करत सीसीटीव्हींची संख्या वाढवली जाणार आहे. रविवारी विद्यापीठ कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मंगळवारी पुन्हा एक अपघात झाला, यामध्ये महिला जखमी झाली आहे, परिसरात वाहनांना रोखण्यासाठी तसेच फोटोशुट व टवाळखोरांना लगाम लावण्यासाठी विद्यापीठ परिसरात सीसीटीव्हीची संख्या वाढवून फिरते पथकही नेमण्यात येणार आहे. अशी माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.काही दिवसांपासून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेल्या अनेक उपाययोजनानंतरही भरधाव वाहनांना रोखण्यासाठीचे उपाय उपयोेगात आलेले नाही. रविवारी विद्यापीठाच्याच एका कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. मंगळवारी १४ मार्च रोजी पत्रकारिता विभागासमोर दुचाकी शिकत असलेल्या एकाने रस्त्यावरुन चालणाऱ्या महिलेला धडक दिली, या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.यानंतर आता विद्यापीठ परिसरात आवश्यक त्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठ परिसरात वाहनांना प्रतितास 20 किलोमीटर वेग ठेवावा लागणार आहे, या संदर्भात ठिकठिकाणी ठळक बोर्डही लावण्यात येणार आहे, विद्यापीठात अनेकजण दुचाकी, चारचाकी वाहन प्रशिक्षणासाठी घेवून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी परिसरामध्ये फिरत्या पथकाची नेमणूक करण्यात येण्यात येईल. या शिवाय आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्यात येतील. वाहनांवरही लक्ष ठेवलेे जाईल असे डॉ. साखळे यांनी सांगितले.परिसरात बाहेरचे विद्यार्थी येऊन गोंधळ घालतात. भांडण करतात, विद्यापीठ प्रशासनाकडून सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूकही केली आहे. तरी वेगाने वाहने चालवणे, वादविवाद करण्याचे प्रकार सुरुच आहेत. अनेकदा भरधाव वाहने घेऊन येणाऱ्या तरुणांचा विद्यापीठाशी संबंध नसतो, शहराच्या विविध भागातून हे तरुण येथे येतात, अशांना लगाम लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तयारी केली आहे.याबरोबरच इतर प्राध्यापक, वरीष्ठ अधिकारी यांनी देखील बाहेरून येणाऱ्यांमुळे विद्यापीठ परिसरात त्रास वाढल्याने यावर अंकुश ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.