मुंबई: शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. फक्त महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांमध्ये सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
भाजपने सुरू केलेलं मंदिर आंदोलन आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली शाब्दिक चकमक या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने अद्यापही मंदिरं सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार मंदिरं उघडी न करून इतर पक्षांना आंदोलन करण्याची संधी देत आहे. त्यामुळे मंदिरं सुरू करण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.