लखनऊ : तिकीट घेऊन किंवा विना तिकीट अशा दोन्ही प्रकारची लोकं ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही पाहिली असतील. आपल्यापैकी बरेच जण कधी ना कधी तिकीट नसलेल्या ट्रेनमध्ये चढले असतील. मात्र, तुम्ही कधीही अशा व्यक्तीला भेटलात का जो सतत तिकीट खरेदी करत असतो पण प्रवास करत नाही? हे काम एक व्यक्ती नाही तर अनेक गावातील लोक करत असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. प्रयागराजजवळच्या दयालपूर स्थानकावर असंच घडतं. इथे लोक तिकिट खरेदी करतात, मात्र प्रवासच करत नाहीत.
त्यामागची कथाही खूप रंजक आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशानुसार तत्कालीन रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी हे स्थानक बांधले होते. अनेक दशकांपासून आजूबाजूच्या लोकांसाठी प्रवासाचे साधन असलेले हे स्थानक 2016 मध्ये बंद करण्यात आले. याचे कारण असे की भारतीय रेल्वेने काही मानके ठरवून दिली आहेत आणि जर एखादे स्टेशन ते पूर्ण करत नसेल तर ते बंद केले जाते.
रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की भारतीय रेल्वे विशिष्ट मानकांची पूर्तता न करणारी स्थानके बंद करू शकते. मेन लाईनवर एखादे स्टेशन असेल तर तिथे रोज किमान ५० तिकिटे काढली जावीत असं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे, जर एखादं स्टेशन ब्रँच लाईनवर असेल तर तिथे दररोज किमान 25 तिकिटे विकली गेली पाहिजेत. भारतीय रेल्वेने ठरवून दिलेल्या महसूल मानकांची पूर्तता न केल्यामुळे स्टेशन बंद करण्यात आलं होतं.स्टेशन बंद केल्यानंतर दयालपूर आणि त्याच्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी अनेक वेळा अर्ज केले आणि शेवटी 2022 मध्ये रेल्वे मंत्रालयाने स्टेशन पुन्हा सुरू केलं. त्यानंतर हे स्थानक बंद होऊ देणार नाही, असा निर्धार येथील नागरिकांनी केला. येथील लोक आपापसात देणगी जमा करून दररोज किमान तिकीट विक्रीचे लक्ष्य पूर्ण करतात. मात्र, हे स्थानक केवळ हॉल्ट म्हणून सुरू करण्यात आले असून इथे केवळ 1-2 गाड्या थांबतात.