Home Uncategorized मुंबईला पीओके म्हणणाऱ्याचे स्वागत करणे माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही -मुख्यमंत्री

मुंबईला पीओके म्हणणाऱ्याचे स्वागत करणे माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही -मुख्यमंत्री

447
0

मुंबई : राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली. “बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?” असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत.

या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे. माझ्या हिंदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुंबईला पीओके म्हणणाऱ्याचं हसत-खेळत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल तुमच्या विनंतीचा सरकार जरुर विचार करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलं आहे.

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
मुख्यमंत्री आपल्या पत्रात लिहितात की, “महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरुर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी आणि उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.

महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्त्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?
मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.

आपण म्हणता गेल्या 3 महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली. त्यातील 3 पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तीनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असून सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र
आपला नम्र –
उद्धव ठाकरे

राज्यपालांनी आपल्या पत्रात काय म्हटलं होतं?

प्रिय उद्धव ठाकरे,
जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सोशल मीडियावरुन नागरिकांशई संवाद साधताना मिशन बिगीन अंतर्गत पुनश्च हरिओमची घोषणा केली होती. याच भाषणात तुम्ही लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची लोकप्रिय घोषणाही केली होती. लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या नागरिकांना तुमच्या या शब्दांनी आशेचा किरण दिसला होता. परंतु या सार्वजनिकरित्या तुम्ही केलेल्या या घोषणेच्या चार महिन्यांनंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु होऊ शकली नाहीत.

11 ऑक्टोबर रोजी सार्वजनिकरित्या बोलताना तुम्ही मंदिराचं लॉकडाऊन पुढे वाढवत असल्याची घोषणा केली. एकीकडे तुम्ही बार, रेस्टॉरंट आणि बीचेस सुरु केले आणि त्याचवेळी दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले. गेल्या तीन महिन्यात मंदिरं सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय न पुढाऱ्यांचाही समावेश होता.

तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे.

मी इथे नमूद करु इच्छितो की दिल्लीत 8 जून रोजी प्रार्थनास्थळे सुरु करण्यात आली आहेत तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशात अनेक ठिकाणी मंदिरं सुरु करण्यात आली होती. मंदिरं सुरु झाल्यानंतर तिथे कोविडचा प्रसार झाल्याचे आढळून आलेलं नाही. मी विनंती करतो की कोविड संसर्गाची योग्य ती काळजी घेऊन राज्यातील मंदिरे सुरु करण्यात यावीत. या पत्रासोबत मंदिरे सुरु करम्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत प्राप्त झालेली तीन प्रेझेन्टेशनही जोडत आहे.

राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी

मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन
राज्यातील व्यवहार पूर्वपदावर येत असली तरी देवाची दारं अजूनही बंदच आहेत. मंदिराची दारं खुली करण्यासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. “मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा बेधुंद तुझे सरकार” अशा घोषणांसह विविध ठिकाणी भजन, घंटानाद आणि उपोषण केलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here