Home अहमदनगर माजी मंत्री, ज्येष्ठ सहकार नेते शंकरराव कोल्हे यांचे निधन

माजी मंत्री, ज्येष्ठ सहकार नेते शंकरराव कोल्हे यांचे निधन

36335
0

कोपरगाव : संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक, संचालक ,माजी सहकार मंत्री, ज्येष्ठ नेते शंकरराव गेनुजी कोल्हे (वय 93) यांचे आज पहाटे नाशिक येथे सुश्रुत रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले.
 सहकाराच्या तळपत्या सूर्याचा आज अस्त झाला. एक मातब्बर सहकार तज्ञ पाणी प्रश्नावर शेवटपर्यंत लढा देणारे व सर्व विषयांचा गाढा अभ्यास असलेले नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या पार्थिवावर 16 मार्च बुधवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता सहजानंदनगर तालुका कोपरगाव संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचा पार्थिव देह येसगाव येथील त्यांच्या वस्तीवर व त्यानं वयतर दुपारी संजीवनी कारखाना स्थळावर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
सहकारातील तळपत्या सूर्याचाअस्त 
शंकरारराव कोल्हे यांनी १९६० मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने  शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा वसा त्यांनी घेतला. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला अनेक पायलट प्रकल्प दिले. १९७२ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून आपली विधानसभेची कारकीर्द  सुरु  केली आणि कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने येथून सुरू झालं. १९८५ ते १९९० चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार होते. १९९९ ते २००४ या काळात त्यांनी कोपरगावच्या विकासाचे ७२९ तारांकित प्रश्न, २१ लक्षवेधी सूचना आणि ४० ठराव मांडले. १९८९ ते २००४ या काळात शंकरराव कोल्हे यांनी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा शासकीय निमशासकीय निधी उपलब्ध करून  विकास का कामांचा डोंगर उभा केला. 
ग्रामीण भागातील शेतकरीची मुले देश-विदेशात उच्च पातळीवर काम करताना दिसली पाहिजे यासाठी त्यांनी संजीवनी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालय उभे करून त्यात कालानुरूप बदल घडवत विविध अभ्यासक्रम आणले आणि शेतकऱ्याच्या मुलाला शिकवले, त्याला प्रगतीचा मार्ग दाखवला. डॉ. मिलिंद, नितीन, बिपीनदादा, अमित, विवेक, सुमित आदींनी शंकरराव कोल्हे यांचा विचार तळागाळात  नेण्यात यश मिळवले.
पूर्वी परिस्थिती जेमतेम होती. पण जनतेच्या विकासाची नाळ, तळमळ माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना होती. त्यात त्यांना वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अ. र. अंतुले, दादा पाटील शेळके, शिवाजीराव नागवडे, मारुतराव घुले, भाऊसाहेब थोरात, यशवंतराव गडाख, बाळासाहेब विखे, शंकरराव काळे, बाळासाहेब भारदे, स्वामी सहजानंद भारती आदींच्या विचारांची साथ मिळाली. सिंह ही त्यांच्या पहिल्या अपक्ष निवडणुकीची निशाणी होती, आणि सुरूवात ते आज पर्यंत सिंह म्हणूनच राहिले. त्यांनी सहा पंचवार्षिक विधिमंडळात अधिराज्य गाजवलं.
शंकरराव कोल्हे यांनी विधिमंडळाची पायरी ही विकासाची पायरी मानत कोपरगावच्या विकासाचे प्रश्न विधिमंडळाच्या वेशीला टांगत सोडून घेतले. या सहा दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली. त्याचे त्यांनी सोने केले. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने तालुक्याची अपरिमित हानी झाली असून ही निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. ज्येष्ठ सहकार नेता आदर्श व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने एकच शोककळा पसरली आहे.

शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या संस्था

शेतकरी सहकारी संघ मर्यादित, कोपरगांव (१९५३) पुर्वीची कोपरगांव तालुका विकास मंडळ (टीडीबी) सहकारी साखर कारखाना लि, सहजानंदनगर (१९६०) वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, पुणे (१९७५) नॅशनल हेवी इंजिनियरींग लि, पुणे (१९७५) संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल, खिर्डीगणेश (१९७८) महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे (१९८९) अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि, शिंगणापुर (०३.१२.१९७५) सुवर्णसंजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि, शिंगणापुर (२०.१०.१९७६) गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघ लि, सहजानंदनगर (१९७६) संजीवनी शैक्षणिक कृषी आणि ग्रामिण विकास विश्वस्थ संस्था, सहजानंदनगर (२६.०७.१९७६) कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहत, कोपरगांव (१९७५) संजीवनी एज्युकेशन सोसायटी, सहजानंदनगर (१९८२) | यशवंत कुक्कुट सहकारी पालन व्यावसायिक संस्था लि. येसगांव (१९८६)
संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर व संजीवनी मोटार ड्रायव्हींग स्कुल, सहजानंदनगर (१५.०९.१९९२) संजीवनी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगांव (१५.०६.१९८४) साई संजीवनी सहकारी बँक लि, कोपरगांव (१९९६) संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्था लि. शिंगणापुर (१९९६) | एकलव्य आदिवासी आश्रमशाळा, टाकळी (२०००)
दिनांक 29.07.2000 -जागतिक व्यापार संघटनेच्या पटलावर भारतातील शेतकज्यांना संरक्षण मिळावे, येथील शेती व्यवसाय टिकावा यासाठी कोपरगांव येथे इंटर नॅशनल फोरम फॉर इंडियन ऍ़ग्रीकल्चर संस्थेची स्थापना करून त्या माध्यमांतुन तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री नितीश कुमार यांच्यापुढे निवेदन सादर करून येथील शेतीला व शेतमालाला संरक्षण मागितले तसेच कॅनकुन येथील जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेच्या बैठकीस इंटर नॅशनल फोरम फॉर इंडियन ऍ़ग्रीकल्चर संस्थेचे प्रतिनिधी पाठवुन भारतातील शेतकज्यांना व त्यांच्या शेतमालास संरक्षण मिळविण्यासाठी जागतिक पटलावर काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here