मागील ४५ वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात ६० टक्के वाढ झाली आहे. भारतातदेखील तरुणांत आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या करणार्यांत ४० टक्के लोक १५ ते ३० वर्षे या वयोगटातील आहेत. अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भीती, नैराश्य, व्यसन, प्रेमभंग या कारणांमुळे मुलं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. यामध्ये आता सोशल मीडियाची भर पडली आहे. सोशल लाईफ आणि रिअल लाईफमधला फरक हल्लीच्या तरुणाईला कळत नाही. इंटरनेटच्या झगमगत्या दुनियेकडे तरुण आकर्षित होत आहेत. मग आपल्या मनासारख्या गोष्टी नाही घडल्या की हीच तरुणाई थेट आत्महत्येचा मार्ग निवडते. असाच एक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील एका २० वर्षिय तरुणाने चक्क इन्स्टाग्रामवर सुसाईड नोट लिहीली होती.
उत्तर प्रदेशमधील चंद्रवल गावातील रहिवासी असलेल्या या २० वर्षिय तरुणाने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर फासाच्या फोटोसह ‘आज मी स्वत:ला संपवणार आहे, गुडबाय’ असा एक मेसेज म्हणजेच सुसाईड नोट लिहीली. मात्र काहीच वेळात सायबर सेलने या तरुणाला शोधून काढत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार लखनऊ मीडिया सेलने या तरुणाच्या पोस्टची माहिती उत्तर प्रदेशमधील गोतम नगर मीडिया सेलला दिली. त्यानंतर या तरुणाचे लोकेशन ट्रेस करण्यात आले आणि त्याला ताब्यात घेत कुटुंबासह पोलीस ठाण्यात घेऊन गेले.