मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेचे मंत्री (शिंदे गट) दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मंत्री दादा भुसे यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी आहे. संजय राऊत यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. येत्या २६ मार्चला मालेगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे ट्विट केलं आहे.
संजय राऊत यांनी काल रात्री साडेनऊच्या सुमारास एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. दादा भुसे यांनी गिरणा अॅग्रो नावाने हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आणि याचे पडसाद आता विधिमंडळात उमटण्याची चिन्ह आहेत.
‘हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल’, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ईडी आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राऊत यांनी या ट्विटमध्ये टॅग केलं आहे.
दादा भुसे हे शिवसेनेचे मंत्री (शिंदे गट) आहेत. २० वर्षाहून अधिकाळापासून पक्षाचं काम करत आहेत. दादाजी भुसे यांचा जन्म ६ मार्च १९६४ ला नाशिकच्या मालेगावमध्ये झाला. त्यांनी डीसीए पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत. मालेगाव बाह्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. दादा भुसे यांना विधानसभा निवडणुकीत सुरवातीला पराभवाचा सामना करावा लागला. नंतर मात्र, त्यांनी २००४ मध्ये प्रस्थापित हिरे घराण्याचा पराभव केला. त्यानंतर भुसे यांनी मागे वळून पाहिलं नाही. मालेगाव बाह्य मतदारसंघात त्यांनी सलग चारवेळा दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते ग्रामविकास राज्यमंत्री होते. ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं. शेतकरी कुटुंबातून आलेल्या भुसेंना कृषीमंत्रीपद दिलं होतं. सध्या त्यांच्याकडे शिंदे सरकारमध्ये त्यांना बंदरे आणि खनिकर्म हे खातं देण्यात आलं आहे.