मुंबई :मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामागे युवासेना नेते वरुण सरदेसाई यांचा काही हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असं धक्कादायक विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नितेश राणे यांच्या आरोपांवर आता वरुण सरदेसाई यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “संदीप देशपांडे यांच्या हल्ल्याची माहिती दुपारी मिळाली. कसब्यातील मिळालेल्या विजयाचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी हे केलं जात आहे का? त्यांच्या अंतर्गत कलहातून हे प्रकरण घडलं असावं”, अशी प्रतिक्रिया वरुण सरदेसाई यांनी दिली.“नितेश राणेंच्या आरोपांना भीक घालत नाही. राणेंच्या आरोपांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी , दिवंगत गानसम्राज्ञी लता दीदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी नितेश राणे काय बोलले हे सर्वांना माहिती आहे”,अशी प्रतिक्रिया वरुण सरदेसाई यांनी दिली.नितेश राणे काय म्हणाले की,या हल्ल्यासंदर्भातील मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजताना दिसला. संदीप देशपांडे यांचा मनसुख हिरेन, दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी विधानसभेत केला आहे. “काही दिवसांपासून संदीप देशपांडे वरुण सरदेसाई नावाच्या व्यक्तीवर सातत्याने आरोप करत आहेत.गेल्या सरकारमध्ये या वरुण सरदेसाईची काय ताकद होती ते आपल्या सर्वांना माहिती आहे. एक कार्यकर्ता जेव्हा विविध विषय महापालिकेत घेत होता त्यानंतर सकाळी त्या कार्यकर्त्यावर हल्ला होतो.वरुण सरदेसाई आणि संबंधित लोकांचं या प्रकरणात सहभाग आहे का याबाबतही चौकशी व्हावी”, असं नितेश राणे आज विधानसभेत म्हणाले.संदीप देशपांडे हे सकाळी शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. एरवी त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र आज ते एकटेच होते. ही संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प आणि रॉड होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना माहहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र देशपांडे यांनीही चांगलाच प्रतिकार केला. हल्लोखोरांशी झटापट करत असताना संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांना डोक्याला किंवा शरीरीवर इतर कुठे जखम झाली नाही. हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमधील लोक त्यांच्या मदतीला धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले.