रायगड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आता आणखी वाढणार आहेत . उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या कथित 19 बंगलो घोटाळाप्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला व या प्रकरणात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात एका ग्रामसेवकाचा देखील समावेश आहे.
विनोद मिंडे, देवंगणा वेटकोळी, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रिमा पिटकर, प्रशांत मिसाळ यांचा समावेश आहे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी वेळोवेळी शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कर आकारणी प्रक्रियेचा जाणीवपुर्वक अंमल केला नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या मिळकत नोंदवहीमध्ये बेकायदेशीर नोंदी घेऊन खोटे दस्ताऐवज तयार केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआर क्रमांक 26 नुसार, आयपीसी कलम 420, 465, 466, 468 आणि 34 प्रमाणे मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता भांगरे यांनी हा गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानं उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरले होते, या प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. आता या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यातआलेला आहे.