पुणे :भारताचे जी-20 अध्यक्षपद हे जगासाठी आव्हानात्मक असलेल्या काळात भारताला मिळालेली एक विशेष जबाबदारी आहे, असे मत, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.आज जगाला भेडसावणाऱ्या आणि भविष्यातील समस्यांवर आज भारत जगाला उपाय शोधून देणारा देश आहे, असेही त्यांनी सांगितले.पुण्याजवळच्या लवाळे येथील सिंबॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ परिसरात गुरुवारी भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळातील जी-20- विचारवंत महोत्सव शिखर परिषदेत त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी एस. जयशंकर म्हणाले, देशहिताचे संरक्षण करण्यासाठी उभे राहण्याचा आमचा संकल्प आहे, तसेच दक्षिणेकडील राज्यांचा आवाज बनण्याची तयारी देखील आहे.
आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, यावर ते म्हणाले की भारत हा सभ्य संस्कृतीचा वारसा असलेला देश असून या काळात अशा नव्या युगाचे नेतृत्व करत आहोत. जिथे विविधतेचा आदर ठेवला जातो. एक असा देश, ज्याची ऊर्जा, उत्साह आणि सृजनशीलता दिवसेंदिवस वाढते आहे त्याच्या भवितव्याविषयी संपूर्ण जगाला विशेष रस आहे.जी 20 च्या अध्यक्षपदाविषयी बोलताना डॉ. जयशंकर म्हणाले की G-20 हे सर्वात महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे आणि या अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत भारत जे करेल, त्यामुळे जगाच्या राजकारणात मोठा फरक पडू शकतो.सिंबॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच कुलगुरू डॉ. एस.बी. मुजुमदार, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला परदेशी विद्यार्थ्यांसह विविध विद्या शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी जयशकंर यांच्याशी संवादही साधला. जय शंकर यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांवर उत्तर देवुन त्यांच्या शंकां दूर केल्या.