मराठवाडा साथी न्यूज
अहमदनगर:– देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये नगरची खास ओळख असलेली वाहन संशोधन व विकास संस्था व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही संस्था येथून हलविण्यात येऊ नये, यासाठी भाजपचे माजी मंत्री दिलीप गांधी यांनी विरोध केला असून यामुळे १ हजार कामगार बेरोजगार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे तातडीने पत्र व्यवहार करत आहे. व्ही.आर.डी.ई चे स्थलांतर रद्द होई पर्यत शांत बसणार नाही. संस्थेतील कर्मचार्यांनी घाबरून जावू नये, यातून नक्की मार्ग निघेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले आहे.
व्हीआरडीई ही संस्था नगर-दौंड रस्त्यावर आहे. ही संस्था केंद्रीय संरक्षण विभागाच्या अंतर्गत येते. संस्थेच्या देशभरात 52 शाखा आहेत. त्यातील नगरची एक शाखा आहे. नगरच्या शाखेतील प्रयोगशाळेने आतापर्यंत अनेक उपयुक्त संशोधने केली आहेत. संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि अन्य सामुग्री येथे विकसित झाली आहे.व्ही.आर.डी.ई संरक्षण संस्था नगरमधून स्थलांतरित होण्यास स्थगिती मिळावी या मागणीचे निवेदन व्ही.आर.डी.ई मधील विविध कर्मचार्यांच्या युनियनच्या पदाधिकार्यांनी दिलीप गांधी यांना देवून या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे .