राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिला. याच संघर्षातून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. आधी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा हीच वेळ आली. गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष आणखीच वाढला आहे. मात्र, आता लवकरच हा संघर्ष संपण्याची चिन्हं आहे.
कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांनी एकमेकांबाबत अशी काही सूचक विधानं केली असल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू असून आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत, असं स्पष्टीकरण माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरजही फडणवीसांनी व्यक्त केलीय.गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांवर टीकेचा भडीमार करणारे फडणवीस आणि ठाकरे यांनी अचानक एकमेकांबाबत सूचक विधानं केल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? अशी चर्चा अनेक राजकीय पक्षात चालू आहे.
'देवेंद्र फडणवीसांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध होते आणि ते आजही आहेत. आमच्या मनात कधीही कटुता आलेली नाही. आमच्या घरात आम्ही कुणालाही व्यक्तिगत पातळीवर शत्रू मानत नाही' असं वक्तव्य माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या कुटुंबावर अनेक आरोप करण्यात आले अगदी खालच्या थराला जावून आरोप करण्यात आले. कधीही माझ्या तोंडातून याबद्दल कधीही अशी विधानं आली नाही.
आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू बिलकुल नाही. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. राजकारणात वैचारिक विरोध असतो मात्र अलीकडच्या काळात शत्रुत्व बघायला मिळतेय ते योग्य नाही. ते कधीतरी संपवावे लागेल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
आधी देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली, ठाकरेंची आली... शिवसेनेत मोठं बंड झालं... ठाकरेंची सत्ता गेली, पुन्हा फडणवीस सत्तेवर आले. ठाकरे विरुद्ध फडणवीस हा सामना चांगलाच चर्चेत आला होता . मात्र, आता दोन्ही नेत्यांनी एकमेकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लवकरच या सामन्याला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात दिसत आहे.