Home आरोग्य घाटीतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णाचे हाल

घाटीतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णाचे हाल

209
0


छत्रपती संभाजीनगर:संपाच्या काळात घाटीतील डॉक्टर सर्व किल्ला एकहाती सांभाळत आहेत. त्यांना नर्सिंगच्या विद्यार्थिनी, कंत्राटी कर्मचाऱ्यांची साथ मिळत असली तरी अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ऑक्सिजनवरील रुग्ण, अर्धांगवायू झालेल्या महिलांना त्यांचे नातेवाईकच एका वाॅर्डातून दुसऱ्या वाॅर्डात नेत आहेत. सत्तर वर्षांच्या दिलावर पठाण (रा. आरतीनगर) यांना दम्याचा त्रास आहे. त्यांना घाटीत भरती केल्यानंतर ऑक्सिजन लावण्यात आला. त्यानंतर मेडिसिन वॉर्डात दाखल केले. तेथून त्यांचा मुलगा जावेद पठाण याने स्ट्रेचरवरून नेले. जावेद म्हणाले, कर्मचारी नसल्याने मी आणि माझ्या कुटुंबांतील सदस्यांनीच स्ट्रेचरवरून आणले.
अर्धांगवायू झालेल्या महिलेस मुलांनीच आणले स्ट्रेचरवर : मीनाबाई कीर्तिकर यांचे सीटी स्कॅन, एमआरआय करण्यासाठी मेडिसिन विभागातून क्ष-किरण विभागात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून त्या घाटीत आहेत. त्यांचा मुलगा कृष्णा कीर्तिकर म्हणाला, एमआरआयसाठी आम्ही स्वत:च आईला स्ट्रेचरवर आणले. कर्मचारी कुठलीही मदत करत नाहीत. आईच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या असून अर्धांगवायूचा त्रास आहे. रुग्णाला नेल्यानंतर स्ट्रेचरदेखील परत नेऊन द्यावे लागते. आणखी एका महिलेला एमआरआय करण्यासाठी आणले होते. त्यांनाही रक्ताच्या गाठी झालेल्या होत्या. त्यांचा मुलगा सलमान शेख म्हणाला, आम्ही आईला स्ट्रेचरवरून एमआरआय करण्यासाठी आणले. दरम्यान, रुग्णांच्या सेवेसाठी दोन नर्सिंग महाविद्यालयांसोबत बोलणे सुरू आहे. ३७ नर्स, विद्यार्थिनी आल्या आहेत, असे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here