छत्रपती संभाजीनगर:औरंगाबादच्या नामकरणास विरोध करत एमआयएमने आंदोलन केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली असून, त्यासाठी १६ मार्च रोजी विभागीय आयुक्तालयावर स्वप्नपूर्ती रॅली काढणार आहे. या माध्यमातून नामकरणाच्या समर्थनार्थ पाच हजार पत्रे देण्यात येतील, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले. त्यामुळे संपूर्ण राज्यासह शहरात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. मात्र, यात काही लोक विरजण घालण्याचे काम करीत असल्याचा आराेप खांबेकर यांनी केला.रॅलीतून शक्तिप्रदर्शन , आयुक्तांना निवेदन देणार खांबेकर म्हणाले, छत्रपती संभाजीनगर नावाला ज्याप्रमाणे विरोध होईल, त्याचप्रमाणे उत्तर देण्यात येईल. शहरातील नागरिकांचे अनेक दशकांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्या सर्वांना सोबत घेऊन मनसेने स्वप्नपूर्ती रॅली आयोजित केली आहे. ही रॅली गुरुवारी सकाळी ११:३० वाजता संस्थान गणपती येथून सुरू होणार असून, हजारो पत्रके आणि समर्थन पत्रे विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहेत. या वेळी दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, सतनामसिंग गुलाटी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती