मनस्विनी साबळे । मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । दोन वर्षांपूर्वी झालेल्या बलात्काराच्या जखमा घेऊन ‘ती’ अल्पवयीन मुलगी कॅनाॅट प्लेससह शहरात फिरते आहे. ना तिला शासकीय यंत्रणेकडून फारशी मदत मिळालेली नाही. म्हणूनच ‘तिच्या’वर जगण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे. निर्भया आणि हाथरसच्या प्रकरणानंतर सहज झालेल्या औरंगाबादकरांच्या संवेदना एवढ्या बोथड झाल्यात का? असाच प्रश्न निर्माण होतो.
नाही संपली ‘तिची’ भटकंती
दोन वर्षांपूर्वी ‘तिच्या’वर नको असलेला प्रसंग आला. एका नराधमाने ‘त्या’ कळीला कुस्करून टाकले. निरागस मनावर मोठा आघात झाला. पण सांगणार कोणाला? आईने तिला पोलिसांत नेले. तिथे ‘तिला’ तेच नको असणारे पण कायद्याच्या चौकटीत गुन्हा बसविण्यासाठीचे प्रश्न विचारले. त्यामुळे तिला न कळत्या वयात अनेक गोष्टी कळाल्या. म्हणूनच ‘तिची’ भटकंती आजही सुरूच आहे.
भीक मागितल्याशिवाय मिळत नाही जेवण
‘ती’ रेल्वे स्टेेशन परिसरात रहायला आहे. आता शाळा लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे कॅनॉट परिसरात सकाळीच तिची आई तिला आणून सोडते. त्यानंतर दिवसभर ती त्या संपूर्ण परिसरात फिरत भीक मागते. त्यानंतर संध्याकाळी ती आईची वाट पाहात तिथेच बसते. तिने दिवसभरात भीक मागून मिळविलेले पैसे तिचे आई घेऊन टाकते. त्यानंतर रात्रीचे जेवण तिला मिळते.
तिला हवा आहे, आधार
तिला हे सांगण्याचे वय नाही किंवा तेवढी तिची समज नाही. तिला मानसिक आणि भक्कम आधाराची गरज आहे. तिच्या घरची आर्थिक परिस्थितीही तेवढी चांगली नाही की तिचे अतिशय चांगल्या प्रकारे पालन पोषण करेल. आज ती एका प्रसंगातून गेली आहे, ना करो की उद्या तिच्या पुन्हा तसाच काही किस्सा घडो. काय असेल तिच्या नशिबात ते माहित नाही.
तिला दिवसभर नसते संरक्षण
ती एकटीच कॅनॉट प्लेस परिसरात फिरत असते. तिला ना कोणाचा आधार असतो ना कुणाचे संरक्षण. तिची आई तिला कुणाच्या भरोश्यावर तिथे सोडते ते माहीत नाही. पण तिला तिथे ओळखणारे कुणी नाही, म्हणूनच तर तिची आई तिला पाठवत नसावी, अशीही शंका आहे. कारण स्टेशन परिसरात तिच्यावर झालेल्या प्रसंगाची माहिती सगळ्यांनाच आहे. त्या जखमा परिसरातील लोकांनी पाहिलेल्या आहेत, म्हणूनच तिला एक भक्कम आधार आणि संरक्षणाची गरज आहे.