मराठवाडा साथी न्यूज
नागपूर : गेल्या महिन्याभरापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु असून शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे आज(१६ जाने.)काँग्रेसकडून नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान पक्षाने आदेश दिला तर पंतप्रधान मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही,असे विधान काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केले आहे.धानोरकरांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
आंदोलनावेळी धानोरकर म्हणाले की, भाजपा ही आमची पैदाईश आहे.१९०७ मध्ये यांनी प्रवेश केला आणि १९२५ मध्ये जन्म घेतला. ज्या पद्धतीने अमेरिकेतून ट्रम्प हद्दपार झाला, त्यापद्धतीने मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय राहणार नाही. बाळू धानोरकर महाराष्ट्रातला एकमेव खासदार नाही. पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकत माझ्यामध्ये आहे. आता तीन वर्ष बाकी आहेत. या तीन वर्षाच्या कालखंडात पक्षाने आदेश द्यावे की धानोरकर जा तुम्ही वाराणसीत. जर मी गेलो नाही, लढलो नाही आणि जर नाही मोदींचा ट्रम्प केला तर नावाचा बाळू धानोरकर सांगणार नाही,असे म्हणत धानोरकरांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.