नाशिक : आज भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाशिकमध्ये आहेत. त्या भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यापुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. आज गोपीनाथ मुंडे असते तर परिस्थिती वेगळी असती का? या प्रश्वावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की जर पक्षात काही नेते आज असते तर निश्चितपणे राजकीय चित्र वेगळ असतं. पंकजा मुंडे यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.दरम्यान पंकजा मुंडे नाशिकमध्ये ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, त्याचं निमंत्रण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेलं नाही. यावर पंकजा मुंडे यांनी बोलणं टाळलं. देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नाही, ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकत आहे. मी या कार्यक्रमाची यजमान नसल्याने यावर बोलणं अयोग्य ठरेल असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन -तीन दिवसांमध्ये राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या परिस्थितीवर मी बोललचं पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी माझी देखील अपेक्षा असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागा वाटपाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं पंकजा मुंडे यांनी टाळलं. त्या बैठकीला मी उपस्थित नव्हते असं त्यांनी म्हटलं आहे.