अमरावती:पश्चिमेकडून तसेच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या संगमामुळे जिल्ह्यात १५ ते १८ मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात तुरळक तर काही भागात मध्यम पाऊस, गारपीट होऊ शकते. असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांनी वर्तवला असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरचे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. सचिन मुंढे यांनी दिली. जिल्ह्यात १५ ते १८ मार्चदरम्यान तुरळक तसेच एक ते दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. याच काळात प्रतितास ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार आहे. या काळात आकाश ढगाळ राहणार आहे. अशा वातावरणामुळे भाजीपाला व फळ पिकाची काढणी लवकर करून घ्यावी. तसेच आता हरभरा आणि गहू परिपक्व स्थितीत आले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही काढणी केली नसेल त्यांनी काढणी करून घ्यावी.
वाऱ्याचा वेग अधिक राहणार असल्यामुळे संत्रा फळांची तोडणी करून घ्यावी. फळबागेतील झाडांना बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार द्यावा. परिपक्व झालेली टरबूज आणि खरबुजाची फळे तोडून घेऊन सावलीत ठेवावी. तसेच कांदासुद्धा काढून घ्यावा. सोबतच बाजार समितीमधील उघड्यावर ठेवलेल्या मालाला ताडपत्रीने झाकून ठेवावे किंवा शेडमध्ये माल ठेवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे (बडनेरा) वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिंह आणि कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. सचिन मुंढे यांनी केले आहे