औरंगाबाद । कोरोनाकाळात सर्वत्र मंदीची लाट उसळली आहे. या वातावरणातही ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीला अधिक वाव दिल्याचे दिसून आले. औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात मोबाइल व टीव्हीची खरेदीची उलाढाल झाली. मागच्या काही काळात औरंगाबाद बाजारपेठात इलेक्ट्रॉनिक वस्तुंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर नवीन वस्तु खरेदी करण्याची परंपरा प्रारंभीपासून आहे. कोरोनाच्या व मंदीच्या परिस्थितीत देखील नागरिकांनी ही परंपरा कायम ठेवली. शहरातील अनेक शोरूम तसेच इलेक्ट्रॉनिक शॉप्समध्ये ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहुर्तावर प्रचंड गर्दी केली. यावेळी ग्राहक टीव्ही आणि मोबाइल खरेदी करताना दिसून आले. यावरून आजच्या काळात मनोरंजनाचा प्रभाव किती आहे हे लक्षात येते.