Home अहमदनगर कोरोनाने जिवाभावाचा माणूस हिरावून नेला, ते दुःख फार मोठे – आ.आशुतोष काळे

कोरोनाने जिवाभावाचा माणूस हिरावून नेला, ते दुःख फार मोठे – आ.आशुतोष काळे

24101
0

तीन महिन्यांच्या वेतनातून ३५० निराधार भगिनींना आर्थिक मदत

कोपरगाव : किसन पवार
कोरोनाने अनेकांचे आप्त, घरातील कर्ती माणसं हिरावून घेतले त्या महिलांचे दुःख फार मोठे आहे, ते वाटून तर कुणी घेऊ शकत नाही मात्र आपले तीन महिन्याचे वेतनातून ज्या महिलांचे पती गेले त्यांना २ हजार १०० रुपयांची अल्पशी मदत करत असून
अशा सर्व महिलांना माझ्याकडून ही कर्तव्य भेट आहे. तुमच्यावर अनपेक्षितपणे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र तुम्हाला आता तुमच्या कुटुंबासाठी हे दु:ख विसरावे लागणार आहे. त्यामुळे आता दु:ख विसरा आणि लढायला शिका, तुमचा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी कोरोनाने पती गमाविलेल्या महिलांना दिली.
महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले त्या एकूण ३५० महिलांना प्रति २१०० रुपये असे ७ लाख ३५ हजार असे तीन महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय आ. आशुतोष काळे यांनी घेतला आणि त्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, मधुकर टेके, रोहिदास होन, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा गंगूले, माधवी वाकचौरे, सपना मोरे, वर्षा शिंगाडे, उमा वहाडणे, सुहासिनी कोयटे, संगिता मालकर, सुधा ठोळे, स्वप्नजा वाबळे, वैशाली आभाळे, डॉ.वैशाली आव्हाड, मीनाताई गुरले, रुपाली गुजराथी, गायत्री हलवाई उपस्थित होते. आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की, मागील वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक कुटुंबावर मोठे आघात केले. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावे लागले असून जिवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली आहेत. ते दु:ख मी देखील सोसले आहे. मात्र कोविडमुळे ज्या महिलांना अचानक वैधव्याला सामोरे जावे लागले व त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती कोरोनाने हिरावून घेतला त्या महिलांचे दु:ख नक्कीच मोठे आहे. एकीकडे पती गमविल्याचे दु:ख तर दुसरीकडे पतीच्या रूपाने घरातील कमावती व्यक्तीच्या निधनामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार, मुलांचे शिक्षण कसे पूर्ण होणार असे प्रश्न या महिलांपुढे आहेत. त्यामुळे त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी या उद्देशातून छोटीशी कर्तव्यभेट म्हणून मी माझे तीन महिन्याचे वेतन दिले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून देखील एकल महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळवून देण्यास प्राधान्य देईल जेणेकरून तुमचे दु:ख काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. यापुढे तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या तरी तुमचा हक्काचा भाऊ समजून माझ्याशी किंवा माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करा तुमच्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

रक्षाबंधनाच्या वेळी कोरोनाने पती गमाविलेल्या महिलांना तीन महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले. दुर्दैवाने काही दिवसानंतर मला देखील कोरोनाची लागण झाली. त्यावेळी मी माझ्या कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांचे दुःख पाहिले आहे ते दुःख मी सोसले आहे. सर्वच प्रश्न भावना व्यक्त करून सुटत नसतात त्यासाठी मदत देखील महत्वाची असते. त्यामुळे मी आपल्याला आर्थिक मदत म्हणून कर्तव्य भेट देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या आशीर्वादानेच मी या जीवघेण्या आजारातून बाहेर पडलो. 
-आ.आशुतोष काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here