काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सूरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी कारवाई केली आहे. त्या पाठोपाठ आता संजय राऊत यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.
संजय राऊत हक्कभंग प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राऊतांवरच्या कारवाईचा चेंडू आता केंद्राकडे टोलावण्यात आला आहे. त्यामुळे आता राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राऊतांवरच्या कार्यवाहीसंदर्भात राज्यसभेचा अभिप्राय घेण्यात येणार आहे.
विधानसभेकडून संजय राऊतांवरचं हक्कभंगाचं प्रकरण राज्यसभेकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. राऊतांचं भविष्य आता राज्यसभेच्या अभिप्रायावर आधारित असल्याची चर्चा सुरू आहे.