मुंबई : सलग पाच विजय मिळवून महिला प्रीमियर लीगमध्ये धडाकेबाज सुरुवात करूनही अंतिम फेरीसाठी थेट पात्र न ठरलेल्या मुंबई इंडियन्सवर एलिमिनेटर सामना खेळण्याची वेळ आली आहे. हा बाद फेरीचा सामना असल्यामुळे त्यांची आता खरी लढाई असणार आहे.
यूपी वॉरियर्सशी होणारा हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात दिल्लीसमोर आव्हान देईल. याच यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सला साखळीत पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे मुंबई संघाला विजयासाठी शर्थ करावी लागणार आहे.सलग पाच विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्स पुढचे सलग दोन सामने पराभूत झाले. परिणामी, हे पराभव स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आणू शकणारे नव्हते. उद्याचा सामना मात्र विजय आवश्यक असणारा आहे.फलंदाजी ही मुंबईची ताकद होती, परंतु दोन सामने गमावले. त्यात फलंदाजी कोलमडली होती. यूपीविरुद्ध सर्वप्रथम मुंबईला फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे, त्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरला आघाडीवर राहून लढावे लागणार आहे.