कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून राणे कुटुंबाला शिवसेनेने पाहिला धक्का दिल्यानंतर राणे कुटुंबाला शिवसेनेचा धक्का या अर्थाने बातम्या फिरु लागल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सर्वाधिक जागा भाजपानेच जिंकल्याचा दावा केला आहे. इतकचं नाही तर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणेंनी राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही असंही म्हटलं आहे. कोणत्याही नेत्याचं नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे.
भाजपा आणि नितेश राणे यांना धक्का देत सिंधुदुर्ग तालुक्यातील कणकवलीमधील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमधील चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या सर्व सदस्यांवर शिवसेनेने दावा केला होता. उर्वरित तीन सदस्यांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये तिन्ही सदस्य शिवसेनेचेच निवडून आले आहेत. कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे गेलीय.