आक्रमणाचे योग्य नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी असा शानदार खेळ करणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाने किर्गिस्तानचा २-० असा पराभव करून तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहेत .भरगच्च खुमन लंपाक स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताने वर्चस्व सिद्ध केले . त्या अगोदर २२ तारखेला झालेल्या सामन्यात म्यानमारवर १-० असा विजय मिळवला होता.त्यामुळे दोन सामने जिंकणाऱ्या भारताला विजेतेपद सहज शक्य झाले आहे .भारताकडून संदेश जिंन्गनने पहिला गोल केला. त्यानंतर सामन्याच्या अखेरच्या क्षणी कर्णधार सुनील छेत्रीने पेनल्टी किकवर गोल करून भारताच्या २.० विजयावर शिक्का मारला .भारतासह विजतेपेदाची संधी असलेल्या किर्गिस्तानने गोल करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी आक्रमणाची धार वाढवली आणि भारतीयांच्या बचावावर हल्ले केले; परंतु भारतीयांचा बचाव कमालीचा संतुलित राहिला आणि पाहुण्या संघाचे प्रत्येक प्रयत्न खराब झाले .म्यानमारविरुद्धच्या सामन्यात खेळलेल्या संघातून भारतीयांनी आज सहा बदल करताना बचावात अनुभवी खेळाडूंना स्थान दिले होते . यात जिग्नम, अन्वर अली आणि प्रीतम कोतल यांचा समावेश होता. किर्गिस्तानचे सुरवातीचे आक्रमण रोखल्यानंतर भारतीयांनी आपला खेळ सुरू केला. १९ व्या मिनिटालाच गोल करण्याची संधी मिळाली होती. फ्री किकवर ब्रँडन फर्नांडिसने अचूक वेध घेतलाही होता; परतु किर्गिस्तानचा गोलरक्षक टोटकोटेव इर्हाननेने चेंडू अडवला.भारतीयांनी आपल्या आक्रमणात अचूकता आणली आणि ३४ व्या मिनिटाला आणखी एक फ्री किक मिळाली. या वेळी ब्रँडनने थेट गोल करण्याऐवदी चेंडू जिंन्गनकडे दिला आणि त्याने अचूक चेंडू आपल्या पायात घेत शानदार गोल केला. १-० आघाडीमुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला होता. दुसऱ्या बाजुला भारतीय गोलरक्षक गुरप्रीक सिंग संधूला फार काही परिश्रम करण्याची वेळ आली नाही. मात्र काही वेळाने चित्र बदलत गेले. संधूला अधिक दक्ष रहाण्याची वेळ आली; परंतु त्याने निराश केले नाही. दुसऱ्या अर्धाच्या सुरुवातीला त्याने दोन प्रयत्न हाणून पाडले.