मुंबई:मुख्यमंत्री असताना स्वतः अडीच वर्ष काही केले नाही. जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा, सत्ता गेल्याने तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पद गेले आणि वेड्यासारखे बडबडू लागले आहेत, अशाप्रकारचा सणसणीत टोला भाजपचे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.निलेश राणे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नारायण राणे यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांवरही स्तुतीसुमने उधळल्याचे पाहायला मिळाले.नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्री असताना स्वतः अडीच वर्ष काही केले नाही, आणि याला ते द्या, त्याला हे द्या, आम्ही संपाला पाठिंबा देऊ म्हणत आहेत. यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार वैभव नाईक यांच्यावरही टीकेची झोड उठवली. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला.
वैभव नाईक यांनी नारायण राणे दोन महिन्यांत राजीनामा देतील असे वक्तव्य केले होते. याबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले, जसे मला भेटून गेला आणि मी त्याला कानात सांगितले. कान पुढे केला असता तर कानफटात मारली असती. मी केंद्रीय मंत्री आहे राजीनामा का देईन असा प्रश्न नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.आपल्या दोन्ही मुलांची स्तुती करताना नारायण राणे म्हणाले, निलेश राणे आणि नितेश राणे माझी ही दोन्ही मुले महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. मला त्यांच्या कार्याबद्दल, कर्तृत्वाबद्दल गर्व आहे.