गुजरातमध्ये इयत्ता 11वीच्या विद्यार्थिनीला 34 वेळा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी राजकोट न्यायालयाने एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीने या नराधमाचे प्रपोझल नाकारले होते, त्यानंतर रागाच्या भरात त्याने मुलीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली.
मुलीच्या भावाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्यावरही हल्ला केला. ही घटना मार्च 2021 ची आहे, ज्यावर न्यायालयाने आता आपला निर्णय दिला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. चौधरी यांच्या न्यायालयाने हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर कॅटेगरीत ठेवले आहे.
जयेश सरवैय्या असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी वकील झनक पटेल यांनी सांगितले की, न्यायालयाने आरोपीला आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली आणि 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला. या हत्येने साऱ्या समाजाला हादरवून सोडले होते, त्यामुळे न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली. न्यायालयाने दोषीला अपील दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.
आरोपी पुरुष आणि सृष्टी नावाची मुलगी जेतपूरमधील जेतलसर गावचे रहिवासी होते. आरोपी तरुण अनेक दिवसांपासून सृष्टीला त्रास देत होता. 16 मार्च 2021 रोजी तो प्रपोझल घेऊन तिच्या घरी गेला होता. जेव्हा सृष्टीने त्याचे प्रपोझल नाकारले तेव्हा तो संतापला आणि त्याने तिला मारहाण सुरू केली.
पळून जाण्याच्या प्रयत्नात सृष्टी घराबाहेर अडखळून पडली. ती पडताच जयेशने तिच्यावर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. त्याने सृष्टीला 34 वेळा भोसकले आणि तिच्या भावालाही चाकूने जखमी केले. यानंतर रक्ताने माखलेले कपडे आणि हातात चाकू घेऊन तो बाजारातून जाऊ लागला तेव्हा कोणीही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही.
सरकारी वकील झनक पटेल म्हणाले की, सृष्टीवरील प्रत्येक वार असा होता की एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे जयेशने केवळ सृष्टीच नाही तर 34 जणांची हत्या केली आहे, असे म्हणता येईल. ते पुढे म्हणाले की, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान 51 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली आहे. त्यावेळी पोलिसांनी 200 ते 216 पानांचे आरोपपत्रही न्यायालयात दाखल केले होते. माझ्या मते सृष्टी रयानी हत्या प्रकरण हे निर्भया प्रकरणापेक्षाही गंभीर आणि वेदनादायी आहे.