Home होम शेतकरी आंदोलनात; महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू…!

शेतकरी आंदोलनात; महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू…!

343
0

मराठवाडा साथी न्यूज
मुंबईः
गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. २६ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचारानंतर हे आंदोलन अधिकच तीव्र झालं आहे. महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटलेले असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील आंबाबरी गावातील स्थानिक रहिवाशी सिताबाई तडवी (वय ५६) या १६ जानेवारीपासून दिल्लीतील शहाजापूर सीमेवरील शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्येही सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर काल नंदूरबारला परतत असताना जयपूर स्थानकात त्यांची प्रकृती बिघडली. कडाक्याच्या थंडीमुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येतंय.सिताबाई तडवी यांनी यापूर्वीही विविध आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. लोक संघर्ष मोर्चाच्या त्या सहकारी होत्या तसंच, शेतकऱ्यांच्या हक्कासांठी त्यांनी मोर्च्यात भागही घेतला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. लोकसंघर्ष मोर्चाचं उलगुलांन आंदोलन, आदिवासींच्या न्यायहक्कासाठी संघर्ष, अशा अनेक मोर्चात त्या नेहमी पुढे होत्या.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा दिला होता. तसंच, २२ डिसेंबरला अंबानीविरोधात निघालेल्या मोर्च्यातही त्या सहभागी होत्या.
राजधानी दिल्लीत मंगळवारी कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलकांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार घडून आला होता. या हिंसाचारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला असून या आंदोलकाचं नाव नवरीत सिंह असं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here