भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे पुणे लोकसभेच्या जागी पोटनिवडणूक घेतली जाणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान या उपस्थित होणाऱ्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.अजित पवार पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना गिरीश बापट यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून निवडणुक लढवणार असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते. यासंदर्भात विचारले असता, अजित पवार संतापले. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. अशा भाषेत अजित पवारांनी संताप व्यक्त केला. गिरीष बापट यांना जाऊन आज फक्त तिसरा दिवस आहे.इतकी काय यामध्ये घाई आहे. काही माणुसकी प्रकार आहे की नाही. काही महाराष्ट्राची परंपरा आहे की नाही. लोकं म्हणतील यांना थोडी तरी जनाची नाही तर मनाची आहे की नाही.लोकसभा पोटनिवडणुक लागण्याच्या चर्चेवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागू शकते. 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पुण्यात पुन्हा पोटनिवडणुक होऊ शकते.बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा सून स्वरदा केळकर लढवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय काकडे, अनिल शिरोळे, मुरलीधर मोहळ यांचीदेखील नावं राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.