मुंबई : रविवारी मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. सावरकर आमच्यासाठी कायम वंदनीय आहेत, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, मात्र सावरकरांचा आपमान सहन केला जाणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानतंर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.
सावरकर आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. सावरकरांबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे. राहुल गांधी यांची भेट घेऊन मी यावर बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान कालच्या सभेवरून शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला देखील संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. कालच्या सभेत जनतेनं दाखवून दिलं कोणाची नार्को टेस्ट होणार आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून संजय राऊत यांनी शिंदे आणि राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. मालेगावच्या सभेनंतर सदू आणि मधू भेटले. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचं प्रेम नव्यान उफाळून आलं. एकोंमेकांचे आश्रू पुसण्यासाठी त्यांनी भेट घेतली असावी असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.