खामगाव:मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशातच १८ मार्च रोजी दुपारी ३.१५ वाजताचे सुमारास तालुक्यातील गणेशपूर परिसरात गारपीटसह पाऊस झाला. यामुळे गव्हासह इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आ.नानाभाऊ कोकरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.जिल्ह्यावर मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट असताना तालुक्यात १७ मार्च रोजी रात्री दरम्यान वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, दि.१८ रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असतांना दुपारी अचानक गारपीटसह पाऊस झाला. यामुळे नदीला सुध्दा पूर आला होता. त्यामुळे महसूल प्रशासनाने तातडीने सर्व्हे करून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी माजी आ.नानाभाऊ कोकरे यांनी केली आहे.