राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट, मराठवाडा साथी आयोजित ग्रेट टॅलेंट शो स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण
परळी / प्रतिनिधी
कोरोना कालावधीत जगावर या आजारापेक्षाही नैराश्येचे खूप मोठे सावट दिसून येत होते. एकीकडे आजाराची भिती आणि दुसरीकडे पुढे काय होणार? याची चिंता यातूनच नैराश्य वाढत होते. अशा पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमातून सकारात्मक वातावरण निर्माण करणे आवश्यक असते. परळी येथील राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट आणि दै.मराठवाडा साथीने स्पर्धात्मक कार्यक्रमातून नैराश्येचे वातावरण दूर करत एक चांगली दिशा देण्याचे काम केले आहे. स्पर्धेतील विजयाचं केवळ समाधान नाही तर त्याचेही मूल्य एका विशिष्ट स्वरुपाचे असते त्यामुळे स्पर्धेत लढत रहा, जिंकत रहा असा संदेश ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांनी दिला.
राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित व मराठवाडा साथी प्रस्तूत टॅलेंट शो कार्यक्रमाचे आज लोकनेते गोपीनाथरावम मुंडे नटराज रंग मंदिर येथे एका विशेष कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक हेमंत कदम, नायब तहसिलदार बी.एल.रुपनर, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत, इंडिया सिमेंटचे संग्राम भोसले, गायीका लक्ष्मी लहाने, प्रदीप चाटे, ट्रस्टचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, संचालिका सौ. प्रेमा बाहेती, प्राचार्य बी.पी.सिंग, प्राचार्या सौ. दीपा बाहेती, कुलकर्णी मॅडम, परमेश्वर गुट्टे, गंगा गवळी, सोनाली ठक्कर, पूनम जाजू, मधू सिंग, रिया शेटे आदी उपस्थित होते.
लोकनेते गोपीनाथरावम मुंडे नटराज रंग मंदिर येथे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सलग सहा दिवस कलाविष्कार सादर केल्यानंतर ग्रँड फिनालेच्या माध्यमातून विजेत्यांचा गट तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कोरोना लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेले अनुत्साहीत वातावरण ढवळून काढत वेगवेगळ्या कलेचे प्रदर्शन केले होते. आज मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. आपल्या मुख्य भाषणात पुढे बोलतांना ह.भ.प.समाधान महाराज शर्मा म्हणाले की, आजचा पराभव हा उद्याचा विजय असतो. जगावेगळं व्हायचं असेल तर आपणही काही तरी वेगळे करुन दाखविणे आणि जगणे गरजेचे असते असे समाधान महाराज शर्मा म्हणाले. अपयश नावाची गोष्ट आणि त्याबद्दलची भिती एकदा मनातून काढून टाकली की भविष्यात तुमचा जय हा ठरलेलाच असतो असेही ते म्हणाले.
दुःखाने व्यथीत होऊ नका आणि पराभवाने खचून जाऊ नका असा संदेश शर्मा यांनी दिला. उडते हुए पंचियों के पैरों मे बाज नही होता असेही समाधान शर्मा यांनी सांगीतले. दरम्यान, कोरोना नंतर प्रथमच एक सकारात्मक आणि मनाला उर्जा देणारा कार्यक्रम राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट व मराठवाडा साथीने आयोजित केला असून त्यांचे कौतुक करावेसे वाटते असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनीही मनोगत व्यक्त करुन टॅलेंट शो मुळे कलाकारांना व्यासपीठ मिळाल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धीरज बाहेती, सुत्रसंचलन दत्तात्रय काळे, अनिल जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन व सर्व अतिथींचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.