जालना:स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा “दु:खी” राज्य काव्य पुरस्कार कोल्हापूर येथील कवी, लेखक, संपादक, चरित्रकार, डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर झाला. पुरस्काराचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गुढीपाडव्याला म्हणजेच २२ मार्च सायंकाळी ६.३० वाजता जे.ई.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात “कवितेचा पाडवा ” या गाजलेल्या कार्यक्रमात सिने-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते व ज्येष्ठ लेखक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरीत होईल. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संयोजक अभय साहनी, विनीत साहनी, लेखिका, कवयित्री डॉ. संजीवनी तडेगांवकर, अनुभव प्रतिष्ठानचे सचिव पंडितराव तडेगावकर यांनी पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कार वितरणानंतर नागराज मंजुळे व डॉ. विजय चोरमारे यांची मुलाखत डॉ. संजय चौधरी (करमाळा) आणि डॉ. संजीवनी तडेगावकर घेणार आहेत. या वेळी दोन्ही मान्यवरांची सुरेल काव्य मैफल तसेच कार्यक्रम स्थळी प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर (जळगाव) यांच्या चित्रांचे प्रदर्शन पहावयास उपलब्ध असेल, तरी रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.