मुंबई : खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाचा चोर मंडळ असा उल्लेख केल्यामुळे वाद निर्माण झाला.याचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले आहे.राऊतांच्या विधानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली.कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर मुंबईत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसाठी स्नेहभोजनचे आयोजन करण्यात आले,या वेळी संजय राऊतांच्या विधीमंडळासंदर्भातल्या वक्तव्यावर चर्चा झाली.शरद पवार यांनी देखील संजय राऊतांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.संजय राऊत यांच्या विधानाशी मी पूर्ण सहमत नाही, पण त्यावर हक्कभंगाची जी समिती नेमली ती न्यायाला धरून नाही.ज्यांनी आरोप केले तेच या समितीत असतील तर न्याय कसा होईल, अशी भूमिका शरद पवारांनी व्यक्त केली.यावेळी चिंचवडच्या पराभवावर देखील चर्चा झाली.पवार म्हणाले मविआमध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे.कसबा आणि चिंचवड संदर्भात विजय आणि पराभवावर चर्चा एकत्र लढल्यावर काय होतं हे आपल्याला दिसलं, बंडखोरी झाली की काय निकाल लागतो ते देखील स्पष्ट झालं आहे.सर्वपक्षीय नेत्यांनी समाचार घेतल्यानंतर संजय राऊतांची भाषा नरमली आहे.संसद आणि विधिमंडळाचा नेहमीच आदर केल्याची सारवासारव संजय राऊतांनी केली.कोल्हापूरमध्ये विरोधकांचा समाचार घेताना संजय राऊतांची जीभ घसरली.आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही पदं आम्हाला दिली आहेत,याची आठवण करून देताना त्यांनी विधीमंडळाचा अवमान केला आहे.