बीड जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांचे बँक खाते बजाज आलियांज या विमा कंपनीने चुकीचा पीक विमा जमा झाल्याचे कारण देत गोठवले आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला तसेच त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या सिबिलवरही झाला. अशाप्रकारे शेतकऱ्यांचे बँक खाते बँकेला कळवून गोठवणे हे बेकायदेशीर असून संबंधित कंपनीवर शासनाने गुन्हे दाखल करुन दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी विधानसभेत केली आहे.
खरीप हंगाम 2022 मधील विमा धारक शेतकऱ्यांपैकी सुमारे 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 कोटी रुपये रक्कम बजाज आलियांज विमा कंपनीने जमा केले होते. मुळात शेतकऱ्यांना पात्र असूनही विमा मिळत नाही. त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले तर एवढा मोठा व्यवहार करणारी विमा कंपनी जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून पैसे आल्याचे सांगते हे अत्यंत अव्यवहारी आहे असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हणाले.
ऐन अडचणीच्या काळात बँक खाते गोठवल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खात्यावरील जमा पैसे उचलता येत नव्हते. त्या काळात विमा जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता ते 12 हजार शेतकरी नेमके कोणते, याबाबतही संभ्रम असल्याने अनेक शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. तसेच विमा कंपनीच्या चुकीच्या वसुली धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सिबिलवरही परिणाम झाला आणि त्याचा त्रास भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज घेताना होऊ शकतो, असे धनंजय मुंडे म्हणाले.
त्यामुळे विमा कंपनीच्या या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध राज्य शासनाने विमा कंपनीविरोधात गुन्हे दाखल करावेत. तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या सिबिलवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश विमा कंपनीला द्यावेत. विमा कंपनीने केलेल्या चुकीमुळे शेतकऱ्यांना जो त्रास झाला, त्याबाबत विमा कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी केली. यावर राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची नोंद घेतली असून योग्य ती कारवाई तातडीने केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले.