शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनीदेखील उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी ईडीच्या कारवाईला आव्हान दिले आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.न्यायालयाने सोमवारी त्यांची याचिका दाखल करून घेतली. तसेच याचिकेवर मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शविली.
विरोधकांना टार्गेट करीत ईडीने पुन्हा कारवाईचा धडाका लावला आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचे उघडकीस आले आहे. याच अनुषंगाने अनिल परब यांनी ईडीच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सोमवारी त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे याचिका दाखल केली. या वेळी देसाई यांनी याचिकेचे गांभीर्य निदर्शनास आणून देत याचिकेवर तातडीने सुनावणी निश्चित करण्याबाबत खंडपीठाला विनंती केली. त्यांची ही विनंती खंडपीठाने मान्य केली आणि मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली. ईडीला कुठलीही कठोर कारवाई करण्यापासून रोखा तसेच ईसीआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती परब यांनी याचिकेत केली आहे.