एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोईसांकडून कारवाई.
ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लागेल हे पण लक्षात ठेवा,”संदीप देशपांडे यांचं पोलिसांनाच आव्हान
मुंबई : परिवहन सेवेच्या उद्घाटनासाठी वसईत आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. मनसे कार्यकर्त्यांकडून “आयुक्त साहेब वेळ द्या” अशी घोषणा देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढताना मारहाण करण्यास सुरुवात केली. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह ३५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. याच कारणावरून संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. संदीप देशपांडे यांनी व्हिडीओ शेअर करत थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे.
“आमचे महाराष्ट्र सैनिक आंदोलन करत असताना हात उचलणारे पोलीस आम्ही पाहिले. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होते. सरकारचे दलाल असल्यासारखं पोलिसांनी वागू नये. सत्ता येते आणि सत्ता जाते…पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे. तुम्ही कानाखाली मारलीत त्याचीही गरज नव्हती. एवढा माज दाखवू नका. पोलिसांनी सत्तेची दलाली करु नये. एवढीच जर हिंमत असेल तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा….मग आम्ही दाखवतो राज ठाकरेंचे कट्टर मनसैनिक काय आहेत ते…जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज ठाकरेंची शिकवण आहे म्हणून ही गोष्ट सहन करतोय. ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लागेल हे पण लक्षात ठेवा,” असं संदीप देशपांडे यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.