आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱया २५ टक्के आरटीई प्रवेशाला पहिल्या चार दिवसांतच विद्यार्थी, पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १ मार्चपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत तब्बल ६३ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.राज्यात आरटीई प्रवेशाच्या १ लाख १ हजार ९२६ जागा असून १७ मार्चपर्यंत प्रवेश अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित व खासगी कायम विनाअनुदानित अशा ८ हजार ८२७ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या जागांमध्ये वाढ झाली आहे. पालक 17 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी पालकांनी http://student.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
आरटीई प्रवेशासाठी पुणे विभागातून सर्वाधिक १३ हजार ८६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पुण्यात आरटीई प्रवेशासाठी १५ हजार ६५५जागा आहेत. अर्ज करण्यासाठी दिलेल्या मुदतीपर्यंत प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल नागपूर ८११९, ठाणे ५६०६ मुंबई ३२७३ संभाजीनगर ३२०२ रायगड २६३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले आहेत.