Home पुणे झेड दर्जाची सुरक्षा काढून…

झेड दर्जाची सुरक्षा काढून…

527
0


मराठवाडा साथी न्यूज
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे मनसे नेत्या रुपाली पाटील चांगल्याच भडकल्या. राज ठाकरे यांचे लाखो चाहते हेच त्यांचं कवच आहे. सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावं, नाहीतर त्यांची अवस्था भाजपसारखी होईल, असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला. राज ठाकरे यांची झेड दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.
“राज ठाकरेंची झेड सुरक्षा कमी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. सरकारला सत्तेत आल्यापासून याच खेळी खेळायला का आवडतात? राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते आहेत. शरद पवार, राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांची सुरक्षा कमी करुन त्यांचं महत्त्व कमी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत असाल, तर मोठी चूक करत आहात” असं रुपाली पाटील म्हणाल्या.
“राज ठाकरे यांचे लाखो, असंख्य चाहते हेच त्यांचं कवच आहे. भाजप सरकारनेही हेच केलं होतं. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीच फरक दिसत नाही. तीच राजकीय गणितं घाणेरड्या पद्धतीने रंगवणं निषेधार्ह आहे. राज ठाकरे हे अतिमहत्त्वाचे नेते आहेत. मागच्या सरकारमधील मंत्र्यांची सुरक्षा कमी करणं समजू शकतो, पण सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावं. नाहीतर त्यांची अवस्था भाजपसारखी होईल. कारण सत्तेचा गैरवापर आणि चुकीचे निर्णय हे जनता पाहत असते. त्याचा परिणाम सरकारवर होत असतो” असंही रुपाली पाटील म्हणाल्या.
बाळा नांदगावकरांकडूनही समाचार
“राज ठाकरे यांच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू त्यांच्याबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु त्यांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही. त्यांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत. सरकार दरबारी जी कामे होत नाही किंवा ज्या विषयांना मतपेटीसाठी टाळले जाते असे अनेक विषय राज दरबारी निकालात निघतात. त्यांच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे “खुजेपण” ठळकपणे दाखविणारा आहे,” अशी फेसबुक पोस्ट बाळा नांदगावकर यांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here