Home मुंबई राज ठाकरे भावी मुख्यमंत्री ; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय?

राज ठाकरे भावी मुख्यमंत्री ; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय?

222
0

मुंबई : मनसेकडून मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यात राज ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. मनसेच्या या मन की बातवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या देशात लोकशाही आहे. या देशात सामान्य नागरिक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. तुमच्याकडे बहुमत असेल तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. बहुमत नेहमी चंचल असतं. आज आमच्याकडे असेल तर उद्या दुसऱ्याकडे. त्यामुळे बहुमताच्या खेळावर अवलंबून राहू नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी यावेळी राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यावर साखर कारखाना प्रकरणी जोरदार टीका केली आहे. दादा भुसेंकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या दाढीला काल जी आग लागली ती विझवण्याचं काम ते करत आहेत. मी व्यक्तिगत कधीच कुणावर आरोप केला नाही. व्यक्तिगत आरोप करत नाही. मालेगाव भागातील शेतकरी 1 फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरले आहेत. गिरणा अॅग्रो शुगर फॅक्टरीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केले गेले. 175 कोटी रुपयांचे शेअर्स गोळा केले आहेत. त्याचा हिशोब द्या. मी कुठे म्हणतो तुम्ही अमूक केलं, तमूक केलं. हिशोब द्या. शेतकरी हिशोब मागत आहे. फक्त हिशोब मागितल्यावर तुमची दाढी का जळावी? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

आमच्या विरोधात मोर्चे का काढत आहात? त्या पैशाचं काय केलं? हिशोब द्या ना. प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कशा करता न्यायालयात गेलं? कोट्यवधी रुपये तुम्ही गोळा केले आणि हिशोब दाखवता दीड दोन कोटीचा. तुमच्या वेबसाईटवरच आहे. तुम्ही काय आम्हाला महागद्दार म्हणताय. तुम्ही जनतेशी गद्दारी केली. तुम्ही शिवसेनेच्या मतावर निवडून आला. उद्धव ठाकरेंनी तुमच्यासाठी प्रचार केला. तुम्ही गद्दारी केली. तुम्ही आम्हाला सांगू नका. पळून गेलात. तुम्ही कसले खुद्दार? राजीनामा द्या आणि निवडणुकीला समोरे जा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

नवीन वर्ष येऊनही शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाची लकेर दिसत नाही.अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. पण मदत मिळाली नाही, त्यामुळे लोक नाराज आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी म्हणून शिवसेनेचा उल्लेख केला जातो. त्या शिवसेनेच्या गुढीवर मोगलाई पद्धतीने केंद्राने आक्रमण केलं. त्यामुळे लोक नाराज आहेत. ही स्वाभिमानाची गुढी पुन्हा एकदा घराघरावर उभारण्यात येणार आहे, हा जनतेचा निर्णय आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here