छत्रपती संभाजीनगर:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, गंगापूर तालुक्यात मागील आठवड्यात अवकाळी वादळी वारे, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मका, गहू, कापूस, हरभरा, ऊस, भाजीपाला, डाळिंब, मोसंबी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाळीव जनावरेही दगावली आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. विनाविलंब पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली आहे. खैरे यांनी दोन दिवस जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. खैरे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर २५,००० प्रतिहेक्टरी अनुदान वितरित करण्यात यावे. सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान निधी देण्यात यावा. यासाठी सर्कलनिहाय मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी यांना मेळावे घेण्याचे आदेश द्यावेत. पीक विम्याचे पैसे तसेच जी पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली, त्यांचेही अनुदान देण्यात यावे असे ते म्हणाले .